TOD Marathi

पुणे:

आषाढी वारी (Ashadhi Wari) निमित्त श्रिया क्रिएशन निर्मित ‘कैवल्य वारी’ या भक्तिगीतांचा अल्बम नुकताच प्रकाशित करण्यात आला. (Shriya Creation launched a new album on Ashadhi Wari) आषाढी वारी सोहळ्यातील महत्वाच्या टप्प्यांचे वर्णन करणारी भक्तिगीते या कैवल्य वारीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. संगीत क्षेत्रातील नामवंत गायकांच्या आवाजात यातील सर्व १० गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. कैवल्य वारी या अल्बममधील गाणी प्रासंगिक आणि रसाळ आहेत. यातील संतांच्या पालखीच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील अर्थ, भावना, स्वरांमध्ये अंतरमनाला भिडणारे सामर्थ्य आहे, असे उद्गार माजी आमदार उल्हास पवार यांनी काढले. संतांच्या पालखी प्रस्थानापासून पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत वारी मार्गावर प्रत्येक टप्प्याला महत्व आणि मुक्कामाला अर्थ आहे. या गाण्यातील सुंदर स्वरातून ते अभिप्रेत होते. तुकोबांच्या अभंगात सर्व विषय सामावलेले आहेत. त्यात संगीत, गायनाचा समावेश आहे. अशा संतांच्या पालखी सोहळ्यातील वातावरण, प्रसंग या अल्बमच्या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. आषाढी वारीनिमित्त श्रिया क्रिएशन निर्मित वर्षा राजेंद्र हुंजे (Varsha Rajendra Hunje) लिखित कैवल्य वारी हा दहा गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन नुकतेच पुण्यात करण्यात आले. त्या कार्यक्रमात पवार बोलत होते. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, धवल आपटे, पं. शौनक अभिषेकी, (Pandit Shaunak Abhisheki) पं. आनंद भाटे, संगीत संयोजक कमलेश भडकमकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी उपस्थित होते.

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Mandir Pandharpur) समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, विठ्ठल नादब्रम्ह आहे. या नादातून भक्तच विठ्ठलाकडे एकरुप होऊ शकतात. या अल्बममधील काव्यात जीव ओतून गायन व संगीतकाराने जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. अल्बमधील शब्द गायनाने अंतर्मुख केले आहे. काव्यात गोडवा असून, सुंदर आहेत. महेश सूर्यवंशी म्हणाले, पालखी सोहळ्यात नसतानाही या गाण्यातून पालखीसोबत पंढरपूरला जात असल्याची अनुभूती मिळते. या वारीत सर्व प्रवास आपण या गाण्यातून अनुभवता येत असून, हे भाग्य म्हणावे लागेल.

वारीला निघताना घर-दार, मुलं-बाळं, सोनं-नाणं या सगळ्या ऐहिक सुखात रममाण झालेल्या मनाची घालमेल सुरु असते. गृहिणींना तर वारीला निघणे अवघडच वाटत असते. पण एकदा का वारी अनुभवली की पुढच्या वर्षी मनाला आपोआप वारीचे वेध लागतात. ही गोडीच तशी असते. कैवल्य वारीचं पहिलं गाणं वारकऱ्यांच्या मनाच्या याच अवस्थेला धरुन आहे.
सरता आनंदाची वारी
वाटे, नको पुन्हा घरी
अशा शब्दात गायिका शमिका भिडेच्या आवाजात हे गाणे आपल्याला वारीत चालायला घेऊन जाते.

 

आळंदीतून माऊलींच्या प्रस्थानाचं वर्णन करणारं दुसरं गाणं आहे पं. शौनक अभिषेकींच्या आवाजात…
थरथरला कळस
सळसळला पिंपळ
विठूभेटीला निघाले
माझे कैवल्य सोज्वळ

 

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देहूतल्या अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर थांबते, तिथे त्यांची आरती होते. यावर आधारित एक वारीतलं पहिलं सुफी गाणे तयार करण्यात आले आहे.
मैं अनगड अबसे तेरा साया
तुझ्या चरणाशी लीन तुकोबाराया
माऊलींच्या आजोळघरचे आणि सध्या लोकगीतांमधून घुमणारा पहाडी आवाजाचा गायक अवधूत गांधी यांच्या आवाजात हे गाणे ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. कैवल्यावारीतील हे तिसरं गाणं या अतूट नात्याला वाहिलेले आहे.

 

यापुढे चौथं गाणं हे पालखी जेजुरीत पोहोचल्यानंतरच्या वर्णनावरचं आहे. खंडोबा म्हणजे महादेवाचं रुप आणि विठ्ठल म्हणजे विष्णू अवतार… हरी आणि हर अशा दोघांच्या भक्तांच्या मिलाप या गाण्यात आहे. याठिकाणी वारकरी येळकोट येळकोट असा गजर करतात तर जेजुरीतील भक्त विठ्ठल गजरात रममाण होतात.
येळकोट येळकोट गाती वैष्णव
आली वारी गं
विठ्ठल विठ्ठल गजर मल्हारीच्या दारी गं

लोकगीतांच्या अंदाजातील हे गाणे लिटल चॅम्प महाविजेती कार्तिकी गायकवाड-पिसे (Kartiki Gaikwad) हिच्या आवाजात आपल्याला अगदी नकळपणे ठेका धरायला लावतं.

 

विठ्ठल भक्तीमध्ये दंग झालेल्या वैष्णवांच्या स्वागतासाठी निसर्गसुद्धा नटलेला असतो. वारीतील दिवेघाट दृश्य याचेच उदाहरण आहे.
जरी भेगाळले पाय
जरी व्याकुळला जीव
तरी होई परिहार दर्शनाने
आनंदगंधर्व पं. आनंद भाटे (Pandit Anand Bhate) यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेलं हे गाणे ऐकणाऱ्याच्या मनात दिवेघाट उभा करतं.

 

आनंदाने नाचत आणि हरी गजराच्या विठ्ठल नामात एकरुप वारी पुढे जात असतानाच, वाटेवरचे विविध रिंगण हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय…सजलेला माऊलीचा अश्व, त्याच्या मागे मानाचा अश्व रिंगण घालू लागले की, तो प्रसंग पाहून दृष्टी धन्य होते. या रिंगणातील खेळांचं वर्णन करणारं गाणं पं. सुरेश वाडकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले आहे.
वैष्णव बोले धावा धावा
आलो हरिचिया गावा

 

२० दिवसांचा पायी प्रवास करुन वारकरी पंढरपूरला पोहोचतात. आणि विठ्ठलाच्या ओढीने अक्षरशः धावतात. चालता चालता विठू भेटीची चाहूल लागून एक भक्तिमय चैतन्य त्यांच्यामध्ये संचारतं. अठ्ठावीस युगे उभ्या असलेल्या आपल्या लाडक्या विठूरायाचे पाय चेपण्यासाठी वारकऱ्यांचं मन आसुलेलं असतं. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांच्या स्वरसाजात सजलेलं हे गाणं वारकऱ्यांना आपल्यासोबत पांडुरंगाच्या भेटीला घेऊन जातं.

 

मी होणार सुपरस्टार फेम विलास कुलकर्णी यांच्या आवाजात आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या भावना स्वरबद्ध करण्यात आल्या आहेत.
येतो परतूनी देवा
माझी आठवण ठेवा

याशिवाय संत कुळातील जवळपास सर्व संतांच्या नावाचा समावेश करुन एक विठ्ठल गजर तयार करण्यात आला आहे. तो या सर्व गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाला आहे.

आषाढी वारीच्या निवडक टप्प्यांचं आणि सोहळ्याचं वर्णन करणारा हा पहिलाच भक्तिगीतांचा अल्बम विठ्ठल चरणी समर्पित करण्यात आला आहे.